श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय ९

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय नववा या बद्दल जाणून घेणार आहोत.
या अध्यायात आपण पाहणार आहोत की, शंकरराव राजेराय बहाद्दूर हे आपल्या प्रिय पत्नी सहीत अक्कलकोटला येऊन पोहोचतात.
अक्कलकोट येथे अनेक ठिकाणांहून, अनेक भक्त आपले मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असत. ब्राह्मणादी चारही वर्णाचे लोक तसेच पारशी, यवन आदी विविध धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनार्थ येत असत. त्यामुळे श्री स्वामी स्थानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे.
सुंदरा बाई या फार लोभी वृत्तीच्या होत्या. परंतु पुर्व पुण्याई मुळेच त्या स्वामी सेवेत होत्या. श्री स्वामींच्या जवळ होत्या. शंकररावांनी आपली व्यथा सुंदरा बाईं जवळ मांडली. व श्री स्वामींची भेट घडवून आणण्या बद्दल प्रार्थना केली.
शंकरराव हे फार मोठे आसामी आहेत हे सुंदरा बाईंना समजताच त्यांच्या मनात लोभ उत्पन्न झाला. व व्याधीतून मुक्त झाल्यावर दोन हजार रूपये द्याल, असे वचन सुंदरा बाईंनी शंकररावांकडून मागितले. पण शंकररावांनी दहा हजार रूपये देण्याचे कबूल करून संकल्प सोडला.
शंकररावांनी सांगितल्या नुसार त्यांची भेट श्री स्वामींशी झाली. त्यावेळी श्री स्वामी शेख नुर बाबांच्या दर्ग्यात होते. सुंदरा बाईंनी श्री स्वामींना शंकररावांची ब्रह्म समंधाची बाधा दूर करण्यासाठी विनंती करताक्षणी, श्री स्वामी उठले आणि नुकत्याच खोदलेल्या कबरीत छाटि टाकून निजले. तेव्हा एका सेवेकर्याने शंकररावांना सांगितले की, श्री स्वामींनी लीला करून तुमचे मरण चुकवले.
श्री स्वामींनी शंकररावांना कडु लिंबाच्या पाल्यामध्ये दहा मिरे वाटून, ते औषध नियमीत घेण्यास सांगितले व तुझी समंध बाधा दूर होईल असे सांगितले. तेव्हा शंकररावांनी तेथील फकिरांना आणि जनतेला अन्नदान केले. व शेख नुर साहेबांना एक कफनी चढवली.
काही दिवसातच शंकररावांची समंध बाधा आणि व्याधीतून मुक्तता झाली. पुढे काही काळानंतर शंकरराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. व श्री स्वामींना आपल्या व्याधीतून मुक्तता झाल्यानंतर दहा हजार रूपये देण्याच्या संकल्पा बद्दल सांगितले.
तेव्हा सुंदरा बाईस पैसे देऊ नये, असे श्री स्वामींनी शंकररावांना सांगितले. त्या पैशातूनच गावाबाहेर एक चुनेगच्ची मठ भक्तांच्या संगनमताने बांध. अशी आज्ञा शंकररावांना श्री स्वामींनी दिली. हाच मठ आज राजेराय मठ म्हणून अक्कलकोटात प्रसिद्ध आहे.
आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या नवव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय नववा देत आहोत.
अध्याय नववा
श्रीगणेशाय नम:।
घरोघरीं स्वामीकीर्तनें। नित्य होतीं ब्राह्मण-भोजनें।
स्वामी नामाचीं जप ध्यानें। अखंडीत चालतीं ॥1॥
दिगंतरीं गाजली ख्याती। कामना धरोनी चित्तीं।
बहुत लोक दर्शना येती। अक्कलकोट नगरांत ॥2॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक। शूद्र आणि अनामिक।
पारसी यवन भाविक। दर्शना येती धांवोनी ॥3॥
यात्रेची गर्दी भारी। सदा आनंदमय नगरी।
साधु संत ब्रह्मचारी। फकीर संन्यासी येती पैं ॥4॥
किती वर्णावें महिमान। जेथें अवतरलें परब्रह्म।
ते नगरीं वैकुंठधाम। प्रत्यक्ष भासूं लागली ॥5॥
असो ऐशा नगरांत। शंकरराव प्रवेशत।
आनंदमय झाले चित्त। समाधान वाटलें ॥6॥
जे होते स्वामीसेवक। त्यांत सुंदराबाई मुख्य।
स्वामीसेवा सकळिक। तिच्या हस्तें होतसे ॥7॥
व्याधी दूर करावी म्हणोनी। विनंती कराल स्वामीचरणीं।
तरी आपणालागोनी। द्रव्य कांहीं देईन ॥8॥
बाईसी द्रव्यलोभ पूर्ण। आनंदलें तियेचें मन।
म्हणे मी इतुकें करीन। दोन सहस्र रुपये द्याल कीं ॥9॥
ते म्हणती बाईसी। इतुकें कार्य जरी करिसी।
तरी दहा सहस्र रुपयांसी। देईन सत्य वचन हें ॥10॥
बाई विस्मित झाली अंतरीं। ती म्हणे हें सत्य जरी।
तरी उदक घेउनी करीं। संकल्प आपण सोडावा ॥11॥
शंकरराव तैसें करिती। बाई आनंदली चित्तीं।
म्हणे मी प्रार्थूनिया स्वामींप्रती। कार्य आपुलें करीन ॥12॥
बार्ई स्वामींसी बोले वचन। हे गृहस्थ थोर कुलीन।
परी पूर्वकर्में यांलागून । ब्रह्मसमंध पीडितो ॥13॥
तरी आतां कृपा करोनी। मुक्त करावें व्याधीपासोनी।
ऐसें ऐकतां वरदानीं। समर्थ तेथोनी ऊठले ॥14॥
यवनस्मशानभूमींत। आले यतिराज त्वरित।
एका नूतन खांचेंत। निजले छाटी टाकोनी ॥15॥
सेवेकरी शंकररावांसी। म्हणती लीला करुनी ऐशी।
चुकविलें तुमच्या मरणासीं। निश्चय मानसीं धरावा ॥16॥
शंकररावें तया दिवशीं। खाना दिधला फकिरांसी।
आणि शेखनुर दर्ग्यासी। एक कफनी चढविली ॥17॥
मग कांहीं दिवस लोटत। स्वामीराज आज्ञापित।
बारीक वांटुनी निंबपत्र। दहा मिरें त्यांत घालावीं ॥18॥
तें घ्यावें हो औषध। तेणें जाईल ब्रह्मसमंध।
जाहल्या स्वामीराज वैद्य। व्याधी पळे आपणची ॥19॥
प्रकृतीसी आराम पडला। राव गेले स्वनगराला।
कांहीं मास लोटता तयांला। ब्रह्मसमंधें सोडिलें ॥20॥
मग पुन्हा आनंदेसी। दर्शना आले अक्कलकोटासी।
घेउनी स्वामीदर्शनासी। आनंदित जाहले ॥21॥
म्हणती व्याधी गेल्यानंतर। रुपये देईन दहा सहस्र।
ऐसा केला निर्धार। त्याचें काय करावें ॥22॥
महाराज आज्ञापिती। गांवाबाहेर आहे मारुती।
तेथें चुनेगच्ची निश्चिती। मठ तुम्हीं बांधावा ॥23॥
ऐशिया एकांत स्थानीं। राहणार नाहीं कोणी।
ऐसी विनंती स्वामीचरणीं। कारभारी करिताती ॥24॥
सर्वांनुमतें तेथेंची। मठ बांधिला चुनेगच्ची।
किर्ती शंकररावांची। अजरामर राहिली ॥25॥
इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत भाविक भक्त। नवमोध्याय गोड हा ॥26॥
श्रीस्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु॥
थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||




