श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय ८

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय आठवा या बद्दल जाणून घेणार आहोत.
मागील अध्यायात आपण पाहीले की, श्री स्वामींनी विष्णु बुवा ब्रम्हचारी यांचा वृथाभिमान कसा हरन केला, या विषयीचा कथाभाग आला आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहाद्दूर यांची कथा वर्णन केली आहे.
जसे अक्कलकोटची जनता श्री स्वामींच्या चरणी भक्तीस लागली, त्याप्रमाणेच आजुबाजूच्या इतर प्रांतातील जनताही श्री स्वामींच्या चरणी भक्तीस लागली. तत्कालीन निजामशाही राजवटीत दफ्तरदार असलेले, धन धान्याने व सुखाने संपन्न असे शंकरराव राजेराय बहाद्दूर ब्रह्म समंधाच्या व्याधीने ग्रस्त होते.
पुर्व कर्मामुळे झालेल्या समंध बाधेने शंकररावांचे जगणं मुश्कील झाले. शंकररावांकडे अमाप संपत्ती आणि सहा लक्षांची जहागीरी असताना देखील, दुःखी असलेल्या शंकररावांनी समंध बाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच धन दौलत खर्च कली. अनेक अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण संतर्पने केली, दानधर्मही केले पण काहीच फायदा झाला नाही. ब्रह्म समंधाच्या बाधेमुळे त्यांच्या शरीरास अनेक व्याधी जडल्या आणि शरीर काळवंडले.
नियतीने लिहीलेले पुर्व संचित दूर करणारा योग्य सत्पुरुष भेटेलका? आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का? असे विचार सतत त्यांच्या मनाला भेडसावत होते.
शंकरराव श्री दत्तगुरूंचे परमभक्त होते म्हणून दत्तगुरूंची सेवा करण्यासाठी आणि व्याधीतून मुक्त होण्यासाठी ते प्रिय पत्नी सहीत गाणगापूरला आले. आणि अहोरात्र दत्त सेवा करू लागले.
तीन महिन्यांचा काळ उलटल्यानंतर आणखी काही काळाची सेवा केल्यानंतर शंकररावांच्या स्वप्नात एक ब्राम्हण आला आणि अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी सेवा करा असा दृष्टांत झाला.
पण शंकररावांना श्री स्वामीं बद्दल काहीच ठाऊक नव्हते म्हणून ते गाणगापूरातच राहिले.
काही दिवसांनी पुन्हा एकदा शंकररावांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला. त्यामुळे आपल्या प्रिय पत्नीशी संगनमत करून शंकरराव गाणगापूरहून अक्कलकोटला निघाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या आठव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय आठवा देत आहोत.
अध्याय आठवा
श्रीगणेशाय नम:।
जयजयाजी सुखधामा। जयजयाजी परब्रह्मा।
जयजय भक्तजन विश्रामा। अनंतवेषा अनंता ॥1॥
राजे निजाम सरकार। त्यांचे पदरीं दप्तरदार।
राजे रायबहाद्दर। शंकरराव नामक ॥2॥
सहा लक्षांची जहागिर त्यांप्रती। सकल सुखें अनुकूल असतीं।
विपुल संपत्ती संतती। कांहीं कमती असेना ॥3॥
परी पूर्व कर्म अगाध। तयां लागला ब्रह्मसमंध।
उपाय केले नानाविध। परी बाधा न सोडी ॥4॥
समंध-बाधा म्हणोन। चैन न पडे रात्रंदिन।
गेलें शरीर सुकोन। गोड न लागे अन्नपाणी ॥5॥
नावडे भोग विलास। सुखोपभोग कैंचा त्यांस।
निद्रा नयेची रात्रंदिवस। चिंतानलें पोळले ॥6॥
केलीं कित्येक अनुष्ठानें। तैशींच ब्राह्मण संतर्पणें।
बहुसाल दिधलीं दानें। आरोग्य व्हावें म्हणोनी ॥7॥
विटले संसारसौैख्यासी। त्रासले या भव यात्रेसी।
कृष्णवर्ण आला शरीरासी। रात्रंदिन चैन नसे ॥8॥
कोणालागीं जावें शरण। मजवरी कृपा करील कोण।
सोडवील व्याधीपासोन। ऐसा कोण समर्थ ॥9॥
मग केला एक विचार। प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाणगापूर।
तेथें जाउनी अहोरात्र। दत्तसेवा करावी ॥10॥
सेवा केली बहुवस। ऐसे लोटलेे तीन मास।
एके रात्रीं तयांस। स्वप्नीं दृष्टांत जाहला ॥11॥
अक्कलकोटीं जावें तुवां। तेथें करावी स्वामीसेवा।
यतीवचनीं भाव धरावा। तेणें व्याधी जाय दूरी ॥12॥
तरी ते तेथेंची राहिले। आणखी अनुष्ठान आरंभिलें।
पुन्हा तयासी स्वप्न पडलें। अक्कलकोटीं जावें त्वां ॥13॥
हें जाणोनी हितगोष्टी। मानसीं विचारुनि शेवटीं ।
त्वरीत आले अक्कलकोटीं। प्रियपत्नीसहीत ॥14॥
तया नगरीच्या नरनारी। कामधंदा करितां घरी।
स्वामीचरित्र परस्परीं। प्रेमभावें सांगती ॥15॥
कित्येक प्रात:स्नानें करोनी। पूजाद्रव्य घेवोनी।
अर्पावया समर्थचरणीं। जाती अती त्वरेनें ॥16॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत प्रेमळ भक्त। अष्टमोध्याय गोड हा ॥17॥
श्रीस्वामीचरणारविंदार्पणमस्तु ॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृते
अष्टमोऽध्याय: ॥ श्रीरस्तु॥
थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
