श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय ५

श्री स्वामी समर्थ, आपणा सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय पाचवा याबद्दल जाणून घेणार आहोत.
अध्यायाला सुरूवात करताना ग्रंथकाराने, जर सत्पुरुषांचा सहवास लाभला तर भक्तांमध्ये उत्तम बदल घडून येतात असे विधान केले आहे. ज्यांची पुर्व पुण्याई आहे त्यांनाच श्री स्वामींचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परम भाग्यशाली होती. अक्कलकोटच्या मालोजी राजांना ही पुर्व पुण्याई मुळेच श्री स्वामीं सारख्या दिव्य सत्पुरुषांचा सहवास लाभला.
श्री स्वामींची किर्ती पुर्ण भारतभर पसरली होती. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानावर पोहोचली. मल्हारराव गायकवाडांच्या मनात विचार आला की, आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोद्यास घेऊन यावे. या करिता त्यांनी अनेक मातब्बर दिवाण तसेच सरदारां समोर, जो कोणी श्री स्वामींना बडोद्यास घेऊन येईल त्याला आम्ही इनाम आणि जहागीरी देऊन, मानसन्मान देऊ, असा प्रस्ताव ठेवला.
हे ऐकून जाणत्या मंडळींनी काढता पाय घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. अक्कलकोटास निघताना तात्यासाहेबांनी मल्हाररावांकडून बरेचसे धन आणि बराचसा सेवकांचा तांडा घेतला, आणि तात्यासाहेब अक्कलकोटास पोहोचले. श्री स्वामींना खुष करण्यासाठी तात्यासाहेबांनी याचकांना धन द्रव्य दिले. तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले. तात्यासाहेबांनी चोळप्पाला गाठून दहा हजारांची जहागीरी देण्याचे आमिष ही दावले. चोळप्पांना त्यावेळी धनाची चणचण भासत होती. त्यामुळे चोळप्पांला धनाची आशा लागली.
चोळप्पानी हा विषय श्री स्वामींपाशी काढला. आणि आपण बडोद्यास गेल्यावर आपला योग्य सन्मान होईल असे सांगितले. तेव्हा श्री स्वामी हसले आणि म्हणाले, “अरे त्यांच्या मनात भक्तीच नाही, तिथे जाऊन काय उपयोग?” इथे कथेचा पुर्वार्ध संपविताना ग्रंथकाराने उत्तरार्धा विषयी सुतोवाच केलेला आहे. अशा रीतीने श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय पाचवा समाप्त होतो.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय पाचवा देत आहोत.
अध्याय पाचवा
श्रीगणेशाय नम:।
भवकानन वैश्वानरा। अज्ञानतमच्छेदका भास्करा।
पूर्णसाक्षी परात्परा। भक्तां खरा सदय तूं ॥1॥
अक्कलकोट नगरांत। एक तपपर्यंत।
स्वामीराज वास करीत। भक्त बहुत जाहले ॥2॥
वार्ता पसरली चहूंकडे। कोणासी पडतां सांकडें।
धाव घेती स्वामींकडे। राजेरजवाडे थोर थोर ॥3॥
तेव्हां कितिएक नृपती। स्वामीदर्शन घेऊं इच्छिति।
आणि आपुल्या नगराप्रती। आणूं म्हणती तयांसी ॥4॥
बडोद्यामाजी त्या अवसरीं। मल्हारराव राज्याधिकारी।
एकदा तयांचे अंतरीं। विचार ऐसा पातला ॥5॥
दिवाण आणि सरदार। मानकरी तैसे थोर थोर।
बैसले असतां समग्र। बोले नृपवर तयांप्रती ॥6॥
कोणी जाउनी अक्कलकोटासी। येथें आणील स्वामींसी।
तरी आम्ही तयासी। इनाम देऊं बहुत ॥7॥
कार्य जाणूनि कठिण। कोणी न बोलती वचन।
कोणाएका लागून। गोष्ट मान्य करवेना ॥8॥
तेव्हां तात्यासाहेब सरदार। होता योग्य आणि चतुर।
तो बोलता झाला उत्तर। नृपालागीं परियेसी ॥9॥
आपुली जरी इच्छा ऐसी। स्वामीतें आणावें वटपुरीसी।
तरी मी आणीन तयांसी। निश्चय मानसीं असो द्या ॥10॥
ऐसें ऐकोनी उत्तर। संतोषला तो नृपवर।
तैसी सभाही समग्र। आनंदित जाहली ॥11॥
नृपतीसह सकळ जने। त्यापरी तात्यासी सन्मानें।
गौरवोनी मधुर वचनें। यशस्वी हो म्हणती तया ॥12॥
तात्यासाहेब निघाले। सत्वर अक्कलकोटीं आले।
नगर पाहुनी संतोषले। जें केवळ वैकुंठ ॥13॥
पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती। आनंदित झाले चित्तीं।
तेथील जनांची पाहुनी भक्ती। धन्य म्हणती तयांतें ॥14॥
अक्कलकोटींचे नृपती। स्वामीचरणीं त्यांची भक्ती ।
राजघराण्यांतील युवती। त्याही करिती स्वामीसेवा ॥15॥
ऐसें पाहुनी तात्यांसी। विचार पडला मानसीं।
या नगरांतुनी स्वामींसी। कैसें नेऊं आपण ॥16॥
प्रयत्नांती परमेश्वर। प्रयत्नें कार्य होय सत्वर।
लढवोनी युक्ती थोर। कार्य आपण साधावें ॥17॥
करोनी नाना पक्वान्नेंं। करिती ब्राह्मणभोजनें।
दिधलीं बहुसाल दानें। याचक धनें तृप्ते केले ॥18॥
स्वामीचिया पूजेप्रती। नाना द्रव्यें समर्पिती।
जेणें सेवेकरी संतुष्ट होती। ऐसें करिती सर्वदा ॥19॥
ऐशियानें कांहीं न झालें। केलें तितुकें व्यर्थ गेलें।
तात्या मनीं खिन्न झाले। विचार पडला तयांसी ॥20॥
मग लढविली एक युक्ती। एकांती गांठुनी चोळाप्पाप्रती।
त्याजलागीं विनंती करिती। बुध्दिवाद सांगती त्या ॥21॥
जरी तुम्ही समर्थांसी। घेउनी याल बडोद्यासी।
मग मल्हारराव आदरेंसी। इनाम देतील तुम्हांतें ॥22॥
द्रव्येण सर्वे वशा:। चोळाप्पासी लागली आशा।
तयाच्या अंतरीं भरंवसा। जहागिरीचा बहुसाल ॥23॥
चोळाप्पानें कर जोडोनी। विनंती केली मधुर वचनीं।
कृपाळू होउनी समर्थांनीं। बडोद्याप्रती चलावें ॥24॥
तेणें माझें कल्याण। मिळेल मला बहुत धन।
आपुलाही योग्य सन्मान। तेथें जातां होईल ॥25॥
ऐसें ऐकोनियां वचन। समर्थांनीं हास्य करोन।
उत्तर चोळाप्पा लागोन। काय दिलें सत्वर ॥26॥
रावमल्हार नृपती। त्याच्या अंतरी नाहीं भक्ती।
मग आम्हीं बडोद्याप्रती। काय म्हणोनी चलावें ॥27॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा ऐकोत भाविक भक्त। पंचमोध्याय गोड हा ॥28॥
श्रीरस्तु। शुभं भवतु॥
थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
